विजयादशमी/दसरा : Dussehra Festival

‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ ही म्हण संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे .Dussehra Festival हा एक प्रकारचा आनंदोत्सव आहे. भारतीय संस्कृती आणि सण यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक भारतीय सण आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. कोणताही सण आपण का साजरा करतो? यामागील पार्श्वभूमी काय आहे ? याची आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. दसरा किंवा विजयाद‌शमी या सणाला नवरात्रौत्सव असेही म्हणतात. दसरा सण साजरा करण्यामागे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारण आहे. म्हणूनच दसरा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. या सणाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.

दसरा सण केव्हा साजरा करतात ? When is Dussehra Festival Celebrated?

Dussehra Celebration

भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग असलेला दसरा सण हा गौरी गणपतीच्या सणानंतर येतो. दसरा सण आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरु होतो आणि दहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध दशमीला समाप्त होते. तब्बल दहा दिवस चालणारा हा सण भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठा सण मानला जातो. या सणात घटस्थापना, जागर, खंडेनवमी, दसरा (विजयाद‌शमी) हे उपघटक (सण) येतात. त्यांची माहिती यापुढे आपण घेणार आहोत.

दसरा सण कोठे साजरा करतात ? Where is Dussehra Celebrated?

भारतीय उपखंडात आसेतूहिमाचल साजरा केला जाणारा सण म्हणजे दसरा सण होय. हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात. आसेतूहिमाचल म्हणजे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत म्हणजेच संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. इतर अनेक सण प्रादेशिक आहेत. उदा. गौरी-गणपतीचा सण, गौरी-गणपतीचा सण हा महाराष्ट्रापुरता प्रादेशिक आहे. पण द‌सरा सण मात्र संपूर्ण भारतभर विखुरलेला आहे. म्हणूनच या सणाचे नाते भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहे.

दसरा सण का साजरा करतात ? Why is Dasard Celebrated?

दसरा सण का साजरा करतात ? याचे तीन प्रकारे स्पष्टीकरण देता येईल. ते पुढील प्रमाणे—

1. दसरा सण शेती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे.

2. अर्जुनाने शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवलेली शस्त्रे.
3. रामाने रावणावर विजय मिळवला. तो दिवस म्हणजे दसरा.

आता आपण या तिन्ही कारणांची सविस्तर माहिती घेऊया.

1. कृषि प्रधान दसरा. Krushi Pradhan Dasara.

भारत हा परंपरेने कृषिप्रधान देश आहे. या शेतीशी संबंधित अनेक सण आपण साजरे करतो. धरतीमातेला आपण मातृ‌भूमी म्हणतो.जननी म्हणतो. याच धरती मातेमुळे आपल्याला अन्न मिळते. बळीराजा हा कृषिप्रधान राजा होता. त्याचा कारभार जनहिताय होता. या परंपरेतूनच अनेक सण साजरे झाले आहेत. पूर्वीपासून शेतकरी बियाणांची पेरणी करण्यासाठी काही धान्य राखून ठेवायचा. हे धान्य निवडक आणि वेचक असायचे. ते अधिक काळ सुरक्षित राहावे, त्यांना कोणत्याही प्रकारची कीड लागू नये, म्हणून असे धान्य राखेत ठेवायचे. या धान्याला ‘बी’ असे म्हणतात. हे धान्य पूर्ण क्षमतेने उगवतात का ? याची खात्री करण्यासाठीच आश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदे‌ला वेगवेगळ्या घटात( कुंभात) वेगवेगळे धान्य पेरले जायचे. दहा दिवसांनी त्यांची खात्री करायची आणि मग ते बी येणाऱ्या रब्बी हंगामाला आणि त्यापुढील खरीप (पावसाळ्यातील) हंगामाला वापरायचे अशी पध्दत होती.

धान्य पेरणीचा पहिला प्रात्यक्षिक दिवस म्हणजे घटस्थापन होय. नववा दिवस म्हणजे पुढील हंगामासाठी तयारी म्हणून शेतीच्या अवजारांची निगा करून पूजन केले जाते.हाच तो खंडे नवमीचा दिवस. दहावा दिवस आनंदाचा. धान्याची नीट उगवण झालेली असते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शमीच्या (आपट्याच्या) झाडाची पाने वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो. आपट्याच्या झाडाची पाने ही आपल्या मनातील प्रेम व्यक्त करणाचे प्रतिकात्मक रूप असतात. त्यांचा आकार हृदयासारख्या असतो. यातून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते. शेतीसाठी आवश्यक असणारा एकोपा आणि प्रेम निर्माण होते. हा उत्सव गावच्या ग्रामदे‌वतेच्या साक्षीने साजरा केला जातो.

पांडव आणि दसरा सण संबंध: Pandava’s Relation with Dussehra

पांडवांनी स्वकर्तृत्वावर निर्माण केलेले इंद्रप्रस्थ (दिल्ली) दूतात हरल्यामुळे कौरवांनी बळकावले. राज्य गेले. वैभव गेले. प्रतिष्ठा गेली. राज्य परत हवे असेल तर पांडवांनी 12 वर्षे वनवास भोगावा आणि एक वर्ष अज्ञातवासात राहावे. अज्ञातवासात कौरवांनी पांडवांना जर ओळखले तर पुन्हा वनवासात जायचे आणि एक वर्ष अज्ञातवास राहायचे असे कौरव सभेत ठरले होते. त्यानुसार पांडवांनी बारा वर्षे वनवास भोगून एक वर्षाचा अज्ञातवासाचा काळ सुरु केला होता. आपण कुणालाही ओळखू नये म्हणून पाच दिशांना पाच पांडव गेले होते. प्रत्येकाने वेगळे नाव धारण केले होते. अर्जुनाने बृहन्नडेचे नाव (स्त्री) धारण केले होते. हे सगळे वेगवेगळे नाव धारण करून विराट राजाच्या आश्रयाला आले. अज्ञातवाच्या शेवटच्या दिवशी शत्रूने विराट राजावर हल्ला केला. त्याच्या राज्यातील गाई पळवून नेल्या.हे करण्यामागे कौरवांचा हात होता. कारण कौरवांना पांडव तेथेच असल्याचा संशय आला होता. अर्जुनाने विराट राजाला संरक्षण देण्यासाठी आणि पळवून नेलेल्या गाई परत आणणासाठी युद्धात उडी घेतली. त्यापूर्वी त्याने शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली. येथेच ढोलीत लपवून ठेवलेला अर्जुनाचा प्रिय गांडीव धनुष्य होता. तोही घेतला. त्याने शस्त्राची पूजा केली. तो दिवस होता आश्विन शुद्ध नवमीचा. म्हणजेच खंडे नवमीचा होता. म्हणून या दिवशी शस्त्रे पूजतात. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरु झाले अर्जुनाने विराटनगरीची सीमा ओलांडली (सीम्मोलंघन) आणि शत्रूशी युद्ध केले. शत्रूवर विजय मिळवला. हाच तो विजयादशमीचा दिवस !

याच दिवशी सूर्यास्तानंतर कौरवांनी अर्जुनाला ओळखले;पण सूर्यास्त झाल्यामुळे अज्ञातवास संपला होता. पण कौरवांना ते मान्य नव्हते. यावरुन पुन्हा वाद सुरुच राहिला. असो–

3. रावण-राम युद्ध आणि दसरा सण महत्त्व: Battle of Ram and Ravan and Relation with Dussehra.

लक्ष्मणाला शूर्पनखेने लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी राम-लक्ष्मण-सीता वनवासात होते. लक्ष्मणाचे यापूर्वीच सीतेच्या सावत्र बहिणीशी- उर्मिलेशी लग्न झाले होते. लक्ष्मण हा रामा- प्रमाणेच एकपत्नीत्वाचा पुरस्कर्ता होता. त्याने शूर्पनखेचा प्रस्ताव धुडकावत तिचे नाक कापले. या घटनेचा शूर्पनखेला प्रचंड राग आला. ती थयथयाट करत आपल्या भावाकडे म्हणजे रावणाकडे गेली. रावणाला या घटनेचा खूपच राग आला. त्याने चिडून जाऊन पुष्पक यान घेऊन भारतात आला. त्यावेळी राम, सीता, लक्ष्मण वनात होते .महाराष्ट्रातील रामटेक हे सीता हरणाचे ठिकाण होय. तेथून सीतेला पळवून नेऊन श्रीलंकेला घेऊन आला. सीतेला अशोक वनात ठेवले आणि लग्नाची मागणी घातली. सीतेने हा प्रस्ताव धुडकावला. इकडे सीतेचा शोधासाठी रामाने हनुमानाला पाठवले. हनुमानाने लंकेत जाऊन सीता सुरक्षित असल्याची खात्री केली. लंका जाळून परत आला. रामाने वानरसेनेच्या मदतीने सेतू बांधून घेतला. वानर सेनेसह राम लंकेत आला. आणि शांततेचा प्रस्ताव ठेवला; पण रावणाने तो धुडकावला. याच दरम्यान बिभीषण हा रावणाचा भाऊ फितूर झाला आणि रामाला मिळाला.

राम आणि रावण यांच्यात युद्ध सुरु झाले. हे शुद्ध दहा दिवस चालले शेवटी रामाने रावणाचा दहाव्या दिवशी वध केला. तो दिवस म्हणजे दसरा होय. रामाने रावणावर दहा दिवसांनी विजय मिळवला. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात. विजयादशमीच्या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचे प्रतिकात्मक रूप तयार करुन त्याचे दहन केले जाते. रावण हा शूर पराक्रमी आणि सीतेला धक्का न लावणारा शीलवान राजा होता. हेही वाचकांनी विसरु नये.

घटस्थापना: Ghatasthapana

Ghatasthapana

घटस्थापना हा नवरात्रौत्सवाचा पाहिला दिवस होय. गावोगावी घरोघरी घटस्थापना केली जाते. घटामध्ये धान्य पेरुन त्याची स्थापना केली जाते. आपल्या कुलदैवताच्या सा‌क्षीने आणि ग्रामदेवताच्या साक्षीने घटस्थापना केली जाते. हा उत्सवाचा पहिला दिवस होय. या दिवशी प्रत्येक गावात ग्रामदेवतेची स्थापना केली जाते .आणि पूजा केली जाते. घरोघरी कुलदेवतेची व आपापल्या पूर्वजांची प्रतिमेच्या रुपात (टाक) पूजा म्हणजे स्थापना केली जाते.पूर्वजांचा चांदीचा टाक बनवून पूजा करतात. घटात धान्य पेरून त्याची पूजा करतात.

नवरात्रौत्वव: Navaratri Utsav:

ग्रामदेवतेची आणि कुलदे‌वतेची नवरात्री पूजा करून उत्सव साजरा करतात .अनेक नागरिक (भक्त) मंदिरात मुक्कामाला जातात. उपवास धरतात. अलीकडे नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्याची प्रथाही महिलांनी सुरु केली आहे. हा एक आनंदाचा भाग आहे. असो. पण नवरात्रौत्सवाचा मूळ उपदेश सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे.

खंडे नवमी: Khande Navami

या दिवशी शेतकरी लोक आपल्या घरातील शेतीची अवजारे पूजतात. रब्बी हंगामाची ही पूर्वतयारी असते. रामायण- महाभारतातील सांगितलेल्या कथांप्रमाणे खंडेनवमी दिवशी शस्त्रपूजाही करतात. या दिवशी ग्रामदेवतेचा, कुलदेवतेचा जागर असतो. हा उत्सवाचा नववा दिवस होय.

दसरा / विजयादशमी: Dussehra :

Dussehra celebration in Karnataka

हा दसरा उत्सवाचा शेवटचा दिवस. खंडेनवमी दिवशी देव गावात येतो. देवपाटलाच्या घरी येतो.ग्रामदेवतेला वाजत गाजत गावात आणले जाते. दसऱ्याच्या दिवशी वाजत गाजत गावच्या माळावर ग्रामदेवतेला नेले जाते. यालाच सीम्मोलंघन म्हणतात. सीम्मोलंघन म्हणजे आपल्या गावची सीमा ओलांडणे. राजेशाहीच्या काळात राजा आपल्या सैन्यानिशी शत्रू सैन्यावर हल्ला करण्यासाठी सीम्मोलंघन करत असे. आणि विजय प्राप्त करत असे. म्हणून या सणाला विजयाद‌शमी असे म्हणतात.

दसऱ्या दिवशी ग्राम देवतेला साक्षी ठेवून सीम्मोलंघन केले जाते. आपट्याच्या पानांचे प्रतिकात्मक सोने लुटले जाते. या दिवशी घरोघरी जाऊन लोक सोने (आंपट्याची पाने) वाटतात. श्रामदैवताच्या प्रांगणात येऊन एकमेकाला सोने देतात.

आपट्याची पाने ही प्रेमाचे प्रतिकात्मक रूप मानले जाते. सर्वांमध्ये स्नेह भाव निर्माण व्हावा, या हेतुने आपट्याची पाने (सोने) वाटूम लोक आपली नाती घट्ट करतात. सोनं घ्या. सोन्यासारखां राहा। असा एकमेकाला आशीर्वाद देतात. शुभेच्छा देतात.

विजयादशमी दिवशी महाराष्ट्रातील कोल्हापूरात दसरा चौकात छत्रपतीच्या हस्ते सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. साताऱ्यातही असाच कार्यक्रम होतो. मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला लोक उपस्थित राहतात.

कर्नाटक राज्यात म्हैसूरमध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने तेथील राजे सोने लुटतात.या दिवशी म्हैसूर पॅलेस खुला असतो.

Leave a comment