दहावीनंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न दहावी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना पडत असतो. दहावी पास मुले खरे तर गोंधळून गेलेली असतात. त्यांना योग्य निर्णय घेता येत नाही. म्हणूनच आपण दहावीनंतर पुढे काय करायचे? याविषयी मुलांना उपयोगी पडेल अशी मार्गदर्शक चर्चा करणार आहोत.
दहावीचा निकाल आणि टक्केवारी: 10th class result and percentage
दरवर्षी दहावीचा निकाल लागतो आणि पालकांच्यामध्ये जितका उत्साह संचारतो तितकी चिंताही मनाला लागून राहते. दरवर्षीच्या दहावीच्या निकालाकडे नजर टाकली असता निकालामध्ये प्रचंड फुगवटा दिसून येतो. महाराष्ट्रातील सरासरी बोर्डाचा निकाल हा 96% पेक्षा जास्त असतो. कितीतरी मुलांना 90% पेक्षा जास्त गुण मिळतात. 80 टक्क्याहून अधिक गुण मिळणारेही हजारो मुले असतात. साठ ते ऐंशी टक्के गुण मिळणारेही मुले काही कमी नसतात. मुलांच्या टक्केवारीची आकडेवारी पाहता मुलांना परीक्षेत पडलेली टक्केवारी आणि त्यांचे करिअर याचा काडीमात्रही संबंध नसतो. 50% गुण मिळवणारा विद्यार्थी सुद्धा चांगले करिअर बनवू शकतो आणि 99% गुण मिळवणारा विद्यार्थी सुद्धा चांगले करिअर बनवू शकतो ,तसा तो वायाही जाऊ शकतो. म्हणून पालकांनी मुलांची टक्केवारी पाहून शाखा निवडणे किंवा एखादा डिप्लोमा निवडणे चुकीचे आहे.
मुलांची टक्केवारी आणि शाखा निवड-समज गैरसमज: Children’s percentage and branch selection- understanding misunderstanding
बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थीही टक्केवारीनुसार मी सायन्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ, की आर्ट्सला जाऊ? हे ठरवत असतात.
सर्वसाधारणपणे 90% गुण अधिक गुण मिळणारे विद्यार्थी सायन्सची शाखा निवडतात. 80 ते 90 टक्के गुण मिळणारे विद्यार्थी कॉमर्सची शाखा निवडतात आणि 80 टक्के पेक्षा कमी गुण मिळणारे विद्यार्थी आर्ट्सची शाखा निवडतात. खरे तर आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्सला जाणे हे मुलांच्या आवडीवर अवलंबून असले पाहिजे. म्हणजेच दहावीनंतर ज्या मुलांना अकरावी बारावी करायची आहे त्यांनी आपली आवड काय आहे? हे पाहिले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला कोणती शाखा चांगल्या प्रकारे जमेल याचाही विचार केला पाहिजे.
दहावी पास झालेल्या मुलांना आपला कोणता विषय चांगला आहे? आणि कोणता विषय मध्यम आहे किंवा कच्चा आहे याची पूर्णतः माहिती असते. म्हणूनच त्यांनी शाखा निवडताना म्हणजेच अकरावी बारावीची शाखा निवडताना या गोष्टीचा विचार केला तर गोंधळून जायची गरज नाही.
शाखा निवड ही प्रतिष्ठा करू नका: branch selection is not a prestige
दहावीनंतर प्रत्येक पालकाला असे वाटत असते की आपले पाल्य हे सायन्सलाच गेले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका असणे म्हणजेच शाखा निवड करताना आपण आपली प्रतिष्ठा पणाला लावतो. आर्ट्सला जाणे किंवा कॉमर्सला जाणे हे कमी प्रतिष्ठेचे मानले जात आहे यासारखे दुर्दैव नाही. खरे तर मुलांनी पालकांच्या इच्छेनुसार कोणत्या शाखेला जायचे हे ठरवणे तसे अवैज्ञानिक आहे. मुलांना कोणत्या शाखेला जायचे आहे आणि कोणत्या शाखेमध्ये आपण चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो याचा विचार करून मुले निर्णय घेतात, याला वैज्ञानिक असे म्हणतो.
सर्व शाखा चांगल्याच असतात :All branches are good
खरे तर कोणतीही शाखा वाईट नसते. सर्व शाखा चांगल्याच असतात. प्रत्येक शाखेतील टॉपर 20 ते 30 टक्के विद्यार्थी करिअर करू शकतात. याचा अर्थ तुम्ही आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला तर तुम्ही वरच्या 20 ते 30 टक्क्यांमध्ये असायला हवे. किंवा सायन्स शाखेला प्रवेश घेतला असाल तर तेथेही तुम्ही वरच्या 20 टक्क्यांमध्ये असायला हवे. याचा अर्थ तुम्ही कोणती शाखा निवडता याला काहीही महत्त्व नाही. तुम्ही ज्या शाखेतून शिक्षण घेत आहात, तेथे तुमचे कौशल्य आणि गुणवत्ता दाखवणे आवश्यक आहे. असे झाल्यास तुमचे करिअर निश्चितच उत्तम बनत जाईल.
कल चाचणी घेणे आवश्यक आहे का? Is it necessary to take an aptitude test for a child?
दहावीनंतर पुढे काय? हे सांगण्यासाठी आज अनेक ठिकाणी सल्लागार उपलब्ध आहेत. हे सल्लागार पालकांना असा सल्ला देतात की तुम्ही तुमच्या मुलाची कलचाचणी करून घ्या. म्हणजे तुमचे मूल कोणत्या शाखेत जाण्यास योग्य आहे हे त्या कल चाचणीतून कळेल. कल चाचणीचा काहीच फायदा होत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कलचाचणीमुळे त्या विद्यार्थ्याचे कोणत्या शाखेमध्ये जाण्याचे कौशल्य लपलेले आहे, हे समजून येते. आणि त्यामुळे तो विद्यार्थी आपण कोणत्या शाखेत जायचे हे ठरवू शकतो. त्यामुळे कल चाचणी घेतली तर मुलांना विद्या शाखा निवडताना त्याचा फायदा होईल. पण शेवटी करिअर करणे हे सर्वस्व त्या विद्यार्थ्यांच्यावरच अवलंबून आहे.
कॉलेज कसे निवडावे? How to select a college?
बरेच पालक नामांकित कॉलेज निवडण्याच्या पाठीमागे लागलेले असतात. बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या अशा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगाच रांगा लावलेल्या असतात. नामांकित कॉलेज निवडले म्हणजे आपल्या मुलाचे करिअर निश्चित झाले असे बिलकुल होत नाही. म्हणून कॉलेज निवडताना सुद्धा मुलाच्या क्षमतेचा, सोयीचा आणि पालकांच्या खिशाचा विचार करणे आवश्यक आहे. एखादे छोटेसे कॉलेज सुद्धा चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षण देऊ शकते. केवळ मुलांची गैरसोय करून दूरचे कॉलेज मिळवल्यामुळे मुलांचे करिअर होईलच असे नाही. कोणत्याही शाळेचा किंवा कॉलेजचा मुलांच्या करिअरसाठी 25% फायदा होतो , तर 75 टक्के करिअर हे मुले स्वतःच घडवू शकतात. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी मुलांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते.
क्लासेसचे फॅड: Classes fad
सध्या दहावी झाली रे झाली की सगळीकडे वेगवेगळ्या क्लासेसच्या जाहिराती वेगाने पसरू लागतात. त्यामुळे क्लासेस हे अकरावी आणि बारावी साठी विशेषतः सायन्स शाखेसाठी आवश्यकच आहेत असे मुलांना आणि पालकांना वाटत असते. जर तुम्ही उत्तम कॉलेज निवडले आणि तेथील शिक्षक उत्तम प्रकारे सर्व विषय आणि सर्व विषयांचे सर्व घटक शिकवत असतील तर अशा मुलांना क्लासेसची काय गरज असते ? पण अनेक ठिकाणी विषयांचा अभ्यास पूर्णपणे शिकवलाच जात नाही. किंवा एखाद्या विषयाचे शिक्षक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत नसतील तर अशावेळी त्या विषयावर ते क्लास लावणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरत आहे. 2025 सालचा यूपीएससीचा जो निकाल लागला त्या निकालावरून असे स्पष्ट झाले की बहुतांश विद्यार्थी हे सेल्फ स्टडी करून यूपीएससी मध्ये सिलेक्ट झाले होते. आणि ही गोष्ट खूपच अभिमानास्पद अशी आहे. मुलांना एकदा परीक्षेचे स्वरूप समजले की ते सेल्फ स्टडी करून उत्तम प्रकारे गुण मिळवू शकतात. आणि सध्या तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवणे आणि तेही सविस्तर उत्तर मिळवणे गुगल किंवा मेटा सारख्या गोष्टींमुळे सहज शक्य होत आहे. त्यामुळे क्लासेसचा खूप बाऊ करण्यात काहीही अर्थ नाही.
जेईई/नीट/सेट परीक्षांची कशी तयारी करावी? How to prepare Jee/Neet/Set?
जी मुले अकरावी सायन्स मधून शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी जे ई ई, नीट, सेट या परीक्षा महत्त्वाच्या असतात. मुलांना अकरावीचा आणि बारावीचा अभ्यास चांगल्या प्रकारे समजला तर या परीक्षा मुले अगदी व्यवस्थित देऊ शकतात. काही अंशी क्लासेसचे मार्गदर्शन ही उपयुक्त ठरते. क्लासेस मध्ये परीक्षेचे स्वरूप काय आहे? कोणत्या घटकावर कशाप्रकारे प्रश्न येतात? हे उत्तम प्रकारे सांगितले जाते . याशिवाय तेथे भरपूर सराव करून घेतला जातो. त्यामुळे मुले आणि पालक क्लासेसची निवड करतात. परीक्षेचे स्वरूप समजल्यावर मुले अकरावी बारावीच्या अभ्यासाच्या जोरावर उत्तम प्रकारे नीट जेईई किंवा सीईटी ला गुण मिळवू शकतात.
आय आय टी ला कोण जाऊ शकतात? Who can enter in IIT College?
सर्वच मुलांचा आणि पालकांचा असा समज आहे की आपल्याला आयआयटी या भारतातील सर्वोत्तम समजणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळवायचा असेल तर अकरावी आणि बारावी सायन्स करावे लागेल आणि त्यासाठी पीसीएम हे विषय ठेवावे लागतील. अर्थात मुलांचे आणि पालकांचे हे बरोबरच आहे; पण आयआयटीमध्ये सर्वच शाखांतील मुले प्रवेश घेऊ शकतात. हे किती पालकांना माहित आहे? देशातील सर्व आयआयटी कॉलेजमध्ये डिझाईन आयआयटी ही एक वेगळी शाखा असते. या शाखेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोणत्याही शाखेतून म्हणजे आर्ट्स कॉमर्स किंवा विज्ञान अशा कोणत्याही शाखेतून त्याने बारावी परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तो या डिझाईन आयआयटी साठी पात्र ठरू शकतो. डिझाईन आयआयटी हे आपल्या कौशल्यावर अवलंबून असते. डिझाईन आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुलांना एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ही एंट्रन्स एक्झाम आर्ट्स किंवा कॉमर्सचेही विद्यार्थी देऊ शकतात. या परीक्षेचे स्वरूप मुलांना समजले की ही परीक्षा मुले सहज देऊ शकतात आणि आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकतात आणि आपले करिअर उत्तम प्रकारे बनवू शकतात. अशा प्रकारच्या परीक्षा आणि कोर्सेस मुलांना आणि पालकांना माहीत झाले तर निश्चितच मुलांनी सायन्सला जायला हवे हा कल कमी होईल आणि मुले आपल्या आवडीनुसार शाखा निवडतील.
एम पी एस सी/यूपीएससी साठी कोणती शाखा निवडावी? Which branch should be select for mpsc/upsc?
खरे तर एमपीएससी किंवा यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना आपले करिअर करायचे असेल तर अगदी अकरावी आणि बारावी पासूनच या परीक्षांचा थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी सर्वात उत्तम शाखा म्हणजे आर्ट्स शाखा होय. अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये करिअर करण्यासाठी आर्ट्स शाखेची निवड करतात.
काही विद्यार्थी दोन मार्ग निवडतात. पहिला मार्ग म्हणजे एखादा चांगला कोर्स करून आपली नोकरी फिक्स करून ठेवायची आणि मग एमपीएससी किंवा यूपीएससी कडे वळायचे. असे करणारे अनेक विद्यार्थी आहेत. एमबीबीएस करणारे विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी यूपीएससी मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आपला किती वेळ देतात आणि त्यासाठी ते किती झोकून देतात याला खूप महत्त्व आहे.
दहावीनंतर डिप्लोमा करिअर: Diploma career after 10th class
दहावीनंतर आपल्याला अकरावी किंवा बारावीचा त्रास नको असेल तर अनेक मुले डिप्लोमा करण्याकडे वळतात. अर्थात डिप्लोमा मध्ये सुद्धा उत्तम प्रकारे करिअर करता येते. दहावीला मिळालेले गुण आणि बारावीला मिळालेले गुण यात अनेक मुलांच्या गुणांमध्ये खूप तफावत असते. त्यामुळे गुणांवर विश्वास न ठेवता कौशल्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
आयटीआय डिप्लोमा एक उत्तम पर्याय: ITI Diploma is the best option
दहावीनंतर वेगवेगळ्या कौशल्याचे शिक्षण देणारे कॉलेज म्हणजे आयटीआय कॉलेज होय. आज आयटीआय करणारे विद्यार्थी एक तर चांगल्या प्रकारे स्वतःचा व्यवसाय करू शकतात किंवा त्यांना उत्तम कौशल्य प्राप्त झालं असेल तर चांगल्या प्रकारचा जॉबही मिळू शकतात. त्यामुळे आयटीआयचा डिप्लोमा करणे ही एक उत्तम करिअरची संधी आहे.
इंजीनियरिंग डिप्लोमा: Engineering Diploma
दहावीनंतर कॉम्पुटर सायन्स, मेकॅनिकल सायन्स, आयटी सायन्स अशा विविध शाखांचे डिप्लोमा उपलब्ध आहेत. असे डिप्लोमा केल्यानंतर आपल्याला उत्तम गुण मिळाले तर आपण डिग्री ही करू शकतो. किंवा केवळ डिप्लोमावर आपल्याला जॉब मिळू शकतो. येथेही तुमचे डिप्लोमा कौशल्य पाहिले जाते आणि त्यानुसारच चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो.
Skill based training
भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कौशल्यांवर आधारित skill based training देते. हे ट्रेनिंग घेण्यासाठी मुलांना भत्ता मिळतो. आणि या ट्रेनिंग चा उपयोग जॉब मिळण्यासाठी होतो.
पालकांची भूमिका :Role of parents
दहावी पास झाल्यानंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न पालकांना जितका भेडसावतो, तितकाच मुलांनाही भेडसावतो. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक मुले आणि अनेक पालकही चिंतेत असतात. पण मुलांच्या करिअरच्या सुरुवातीलाच पालकांनी किंवा मुलांनी चिंता करण्याची काहीच गरज नाही. मुलांची क्षमता, त्यांचा कल ,त्यांची आवड आणि त्यांच्याकडे असणारे विशिष्ट विषयांचे कौशल्य या विषयावर आपल्या पाल्यांबरोबर पालकांनी नेहमीच चर्चा करत राहिल्यास मुलांना कोणत्या शाखेकडे जायला हवे किंवा मुलाने कोणत्या डिप्लोमाकडे प्रवेश घ्यावा याबद्दल निर्णय घेता येतो. पालकांनी आपले मत मुलांवर लादणे पूर्णतः चुकीचे आहे. पण मुले स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम नसतात त्यावेळी त्यांना मदत करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. दहावीनंतर पुढे काय करायचे? यावर मार्गदर्शन करणारे समाजात अनेक तज्ज्ञ मंडळी असतात .अशा मंडळींच्या संपर्कात राहून आपण निर्णय घेतल्यास मुलांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल ठरेल.
माध्यम आणि करिअर :Medium and career
आपल्या पाल्याने कोणत्या माध्यमातून प्रवेश घ्यावा इंग्रजी माध्यमात की मातृभाषा माध्यमात? हा प्रश्न प्रत्येक पालकाला भेडसावत असतो. खरे तर मातृभाषेतून घेतले जाणारे शिक्षण हे परिपक्व असते. असे यूपीएससी करणारे आणि त्यात यशस्वी होणारे अनेक विद्यार्थी सांगत असतात. त्यांचा अनुभव घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले तर ते अधिक फायदेशीर ठरेल; पण इंग्रजी भाषा ही एक अत्यावश्यक भाषा असल्याने या भाषेचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायची आवश्यकता नाही. मातृभाषा माध्यमामधून शिक्षण घेऊन इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्याला इंग्रजी विषयाच्या प्रभुत्वामुळे पुढील परीक्षा देण्यासाठी कोणत्याही अडचणी येत नाही. त्यामुळे प्रत्येक पालकाने इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेतले पाहिजे हा आग्रह सोडावा आणि मुलांना मातृभाषेतून उत्तम प्रकारे शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळवून द्यावा.