महाराष्ट्र सरकारने नागपूर ते गोवा असा प्रचंड महामार्ग काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे म्हटले जाते. या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांनी प्रचंड विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी महामार्ग रोको आंदोलन होणार आहे.
कोल्हापूरकरांचा शक्तीपीठला विरोध
नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्ग काढून कुणाचे हित होणार आहे ? अंबानी अदानी सारख्या मूठभर लोकांचे की गोरगरीब शेतकऱ्यांचे? शक्तिपीठ महामार्गाचा वापर कोण करणार आहे आणि त्रास मात्र कुणाला होत आहे. असे अनेक प्रश्न या शक्तिपीठ महामार्गाच्या निमित्ताने निर्माण होत आहेत. या महामार्गाची झळ ही सर्वात प्रथम शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांची जमीन या शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात जाणार आहे. सरकारने दाम दुप्पट भाव देऊ असे जरी जाहीर केले असले तरी शेतकरी विरोधाच्या भूमिकेशी ठाम आहे. कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेने या शक्तिपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर 1 जुलै 2025 रोजी महामार्ग रोको आंदोलन होणार आहे. या रास्ता रोको आंदोलनात विरोधी पक्षाचे सर्व आघाडीचे नेते मंडळी उतरणार आहेत. याशिवाय शेतकरी संघटनेची एकजूट या निमित्ताने दिसणार आहे. असे असले तरी सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोधच असल्याचे वरवर बोलून दाखवतात; पण हा विरोध कोल्हापुरातच राहतो. प्रत्यक्ष सरकारी पातळीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीला हा विरोध होत नाही.त्यामुळे विद्यमान आमदार, मंत्री यांच्यावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शक्तीपीठामुळे होणारे नुकसान शेतकरी कसे भरून काढणार? हा मुख्य प्रश्न आहे. ज्या प्रमाणे हिंदी भाषा सक्तीविरोधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचंड विरोध केला आणि हिंदी भाषेचा अंमल होण्यापूर्वीच सरकारने काढलेला जीआर रद्द झाला. त्याप्रमाणे शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड प्रमाणात विरोध झाला तर हे शेतकऱ्यांच्या वरील संकट निश्चितच टाळले जाईल.