कॅन्सरमुक्त भारत:एक अभियान (Reasons of cancer)

भारत हा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि कॅन्सर यांसारखे आजार असलेला देश अशी ओळख निर्माण होऊ नये म्हणून आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कर्करोग (कॅन्सर)वाढत आहे . कॅन्सर हा आजार शंभर टक्के बरा होण्याची सुविधा सध्या तरी या विश्वात अस्तित्वात नाही . म्हणून रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून दक्षता घेणे आवश्यक आहे.

लसीकरणाची प्रतीक्षा:

कॅन्सर हा आजार होऊच नये म्हणून लस निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.प्लेग,पोलिओ सारखे रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाने गेले असले ,तरी कॅन्सरबाबत असा ठाम विश्वास अजून तरी देता येत नाही.त्यामुळे लसीकरणावर अवलंबून राहण्यापेक्षा अन्य उपाययोजनांकडे वळले पाहिजे. कोरोनाच्या बाबतीत सर्वांना लसीकरणाच्या अनुभव आहेच.

कीटकनाशके,तणनाशकांपासून सावध राहा:

अन्नभेसळ ही समस्या इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात खूप मोठ्या प्रमाणात आढळते.अगदी तांदळामध्ये सुद्धा प्लॅस्टिक तांदूळ मिसळले जातात.बाजारातून आपण जे रिफाइंडयुक्त खाद्यतेल विकत आणतो,ते तेल अगदी स्वच्छ,नितळ दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकल वापरतात.असे तेल आपण दररोज वापरतो. हेच बाजारात मिळणाऱ्या फळभाज्या, पालेभाज्या फळे याबाबतीत आहे.फळे लवकर पिकण्यासाठी कार्बाईड वापरले जाते.फळभाज्या, पालेभाज्या झटपट हाताला येण्यासाठी टॉनिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.पिकात तण वाढू नये म्हणून तणनाशक फवारणी केली जाते.पिकांवर रोग,कीड प्रतिबंधात्मक औषधे फवारली जातात.या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो;पण ही गोष्ट कोणीच गांभीर्याने घेत नाहीत.फळे, भाज्या विकत आणल्यावर घरी मिठाच्या पाण्यात किमान वीस मिनिटे बुडवून ठेवल्यास फळांवर आणि भाज्यांवर चिकटून राहिलेले रासायनिक द्रव्य बरेच कमी होते.

जंकफूड टाळा:

अलीकडे जंकफूड खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.वाडपाव,पॅटिस,फिजा, बर्गर, पाणीपुरी यांसारख्या पदार्थांचे अनेक स्टॉल आपणास पाहावयास मिळतात.तळलेले पदार्थ कोणत्या आणि कसल्या तेलात वापरतात हे आपणास माहीत नसते.याशिवाय बाजारातील अनेक खाद्यपदार्थ रूचकर होण्यासाठी टेस्टिंग पावडर वापरली जाते.आता असे खाद्यपदार्थ खाणाऱ्या खवय्यांची संख्या काही कमी नाही.वारंवार बाहेर जेवणाला जाण्याचे आणि बाहेरचे पदार्थ मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. मग काय होईल आपल्या आरोग्याचे? जरा कल्पना करा.

फेरीवाल्यांपासून सावध राहा:

लहानपणी दारोदार फिरून गारेगार, बर्फाचा थंडगार गोळा विकणाऱ्या फेरीवाल्यांकडून गारेगार आणि रंगीत बर्फाचा गोळा विकत घेऊन खाण्यात आम्हाला खूप मजा यायची. आताही या सर्व गोष्टी मिळतात; पण त्या शुद्ध स्वरूपात मिळतील याची खात्री नसते.बर्फ कोणत्या आणि कुठल्या पाण्यापासून बनवलेत याची खात्री नसते.रंगीत गोळ्यात वापरलेला रंग केमिकल फ्री असेलच असे नाही.म्हणूनच म्हटले जाते,जाने कहॉं गये ओ दिन….*

दुधातील भेसळ:

आजकाल दुधात सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे.कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्टी रासायनिक पावडर यांच्यापासून दूध निर्माण करणाऱ्या फॅक्टरीच्या फॅक्टरी निर्माण होत आहेत.असे दूध आरोग्यासाठी खूप घातक असते.कारण ते दूधच नसते.पांढरे शुभ्र रसायन असते. बाजारातून दूध घेताना गोकुळ, चितळे, वारणा,अमूल यांसारख्या ब्रॅण्डेड संस्थांचे दूध विकत घ्यावे.विशेषत: शहरी लोकांनी अशी काळजी घेणे आवश्यक आहे . नियमित आल्याचा चहा घेणाऱ्यांना आरोग्य विषयक नियम पाळणाऱ्यांना विशेषतः कर्करोग होत नाही.

व्यसनमुक्त अभियान:

कॅन्सरमुक्त भारत हा विचार करताना आपण केवळ आहार आणि खाद्यपदार्थ याबाबत विचार न करता तंबाखू, गुटखा,बिडी,शिगारेट यांसारख्या व्यसनांचाही निषेध केला पाहिजे. संपूर्ण भारतात व्यसनमुक्त अभियान राबविण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.तमाम भारतीय जनतेत आरोग्य साक्षरता निर्माण होण्यासाठी हा केलेला लेखरूपी खटाटोप वाचकांना निश्चितच आवडेल.

 

संभाजी पाटील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राधानगरी

Leave a comment