अवचितगड / Avchitgad fort

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या नगराजवळ कुंडलिका नदीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला इतिहासाचा साक्षीदार म्हणजे किल्ले ‘अवचितगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 350 किल्ले होते. अवचित‌गड हा त्यांतीलच एक होय. या अवचितगडाविषयी आता आपण माहिती घेऊया—-

गडाचे नाव : अवचितगड

समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 500 मी.

गडाचा प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी: सोपी

ठिकाण. :. रोहा, अवचितगड

जवळचे ठिकाण : रोहा

डोंगररांग : सह्याद्री, उतरण

सध्याची अवस्था: चांगली जीर्णोद्धार आवश्यक

स्थापना : 09 वे ते 10 वे शतक

रोहापासून अंतर : 7.5 किमी.

अवचितगड पाहायला कसे जाल ? How to go to Avachitgad fort ?

रोहा या छोट्या शह‌रातून अवचितगडाला कुंडलिका नदीच्या पुलावरून पलीकडे जाता येते. रोहापासून अवचितगड 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या पायथ्यापासून केवळ 320 मीटर चढाई करावी लागते. पायथ्यापासून गडावर 20 ते 30 मिनिटांत आरामात जाता येते.

लोणावळ्याहून खोपोली मार्गे अवचितगडला चार चाकी वाहनाने जाता येते. लोणावळा ते अवचितगड अंतर 75 किलोमीटर आहे.

महाडडून लोणेरे, माणगाव, रोहा मार्गे चार चाकी वाहनाने अवचितगड‌ला जाता येते. महाडपासून अवचितगड 67 किमी अंतरावर आहे.

पेणहून डोलवी, नागेठणे मार्गे चार चाकी वाहनाने अवचितगडला जाता येते. पेण ते अवचितगड अंतर 41 किलोमीटर आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत वाहने जातात. त्यामुळे चालण्याचे फारसे कष्ट घ्यावे लागत नाही.

अवचितगडचा इतिहासः History of Avachitgad.

इ.स. 9 वे शतक वे इ.स. 10 वे शतक या काळात शिलाहार राजांनी या किल्ल्याची बांधणी केल्याचे किल्ल्याचे बांधकाम आणि अवशेष पाहिल्यानंतर लक्षात येते.त्यानंतर काही काळ हा किल्ला निजामशहाकडे होता.

अहमद‌नगरच्या निजामशहाकडे असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याची मजबूत पुनर्बाधणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सच्चा साथीदार बाजी पासलकर यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याची दुरुस्ती झाली असल्याची शक्यता आहे.

या किल्ल्याच्या एका बुरुजावर एक शिलालेख आहे. या शिलालेखात शके 1718 सालाचा उल्लेख आहे. म्हणजेच इ.स. 1795/96 च्या काळात किल्ल्याचे काही बुरुज बांधून घेतले असतील आणि त्यावेळी पुन्हा किल्ल्याची दुरुस्ती झालेली असणार, असे वाटते.

गंमत अशी की जुन्याच किल्ल्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांनी घाईगडबडीत पुनर्बाधणी केली. त्यामुळे छत्रपती शिवरायांनीच या किल्ल्याला ‘अवचितगड’ असे नाव ठेवले.अवचित निर्माण झालेला गड. अद्याप हा गड अवचितगड या नावानेच ओळखला जातो. विशेष म्हणजे हा अवचितगड उभारणीकामी शेख महंमद याने शिवरायांना बहुमोल सहकार्य केल्याचा उल्लेख आहे.

ब्रिटिश काळात इंग्रजांनी एका पाठोपाठ एक असे किल्ले ताब्यात घेण्यास घेण्यास सुरुवात केली. कर्नल प्रॉथर याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी इ.स. 1818 मध्ये सूरगड पाली, भोरपगड ताब्यात घेऊन लगेच अवचितगडावरही हल्ला करून गड ताब्यात घेतला. 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आल्याने मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रश्नच आला नाही.

अवचितगडावरील प्रेक्षणीय स्थळे Spectacular Places on Avachitgad Fort:

गडाचे प्रवेशद्वार:

गडाच्या मुख्य दरवाजाची अवस्थाही आता बिकट झाली आहे . हेच गडाचे प्रवेशद्वार होय. या दरवाजातून आत गेल्यास डावीकडे ‘शरभ’ असे लिहिलेले शिल्प दिसते. या शिल्पावरून हा गड शिलाहार राजघराण्याच्या काळातील असल्याचे स्पष्ट होते.

गडाच्या दक्षिण बुरुजाकडे एक दरवाजा आहे. तो पूर्णतः ढासळलेल्या अवस्थेत आढळतो. या बुरुजाच्या भिंतीतही शके 1718 सालचा (इ.स. 1796) शिलालेख आहे.

गडाचा बालेकिल्ला:

गडाच्या दक्षिणेकडील बाजूला अवचितगडाचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला हा गडाच्या सर्वांत उंच ठिकाणी असतो. या बालेकिल्ल्याची लांबी सुमारे 300 मीटर आहे; तर रुंदी सुमारे 100 मीटर आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूला दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. अवचितगडावर एक पाण्याचा पाण्याचा हौद पण आहे. हा हौद द्वादशकोनी म्हणजे बारा कोनी आहे.

गडावर पश्चिमेकडील बाजूला खड‌कात कोर‌लेल्या पाण्याच्या टाक्या आहेत.

पाण्याच्या टाक्या व हौद:

गडावर बारा कोनी सुबक बांधीव पाण्याचा हौद आहेच. याशिवाय पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी गडाच्या पश्चिमेकडील बाजूला पाण्याच्या सात टाक्या आहेत. या सातही टाक्या पूर्णतः खडकात खोदलेल्या आहेत.

गडावरील बाजीची समाधी :

गडावरील एक घुम‌टीत शेंदूर लावलेला दगड आहे. ही समाधी बाजीची आहे असे सांगितले जाते. बाजी पासलकरचा या गडावर वारंवार वावर असल्याने ही समाधी बाजी पासलकरची असावी, असा तर्क लावला जातो; पण बाजी पासलकरची समाधी तर सासवडला आहे. मग ही समाधी कोणत्या बाजीची ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

गडावरील तोफा:

गडावर तोफा असणे हे गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. तोफा असणे हे गडाचे भूषण मानले जाते. अवचित गडावरही पाच तोफा आहेत.यातील एक-दोन तोफांची झीज झाली आहे.

पिंपळसई देवीची घुमटी :

घुमटी म्हणजे घुमट. छोट्या आकाराचे मंदिर, गडावर छोट्या आकाराची देवीची घुमटी आहे. ही घुमटी पिंपळसई देवीची आहे.

गडावरील बुरुजः

गडावर सहा-सात तरी बुरुज आहेत. यांतील इ.स. 1796 साली बांधलेला एक बुरुज आहे. या बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे या बुरुजावर जाऊन सभोवार नजर फिरवल्यास येथून तोरणा किल्ला (प्रचंडगड), राजगड, सिंहगड (कोंढाणा),रायगड, लिंगाणा इत्यादी गड दिसतात. याशिवाय येथून कुंडलिका नदीचेही विलोभनीय दृश्य दिसते. जवळच सात किलोमीटरवर असलेले रोहा शहर या बुरुजावरून स्पष्टपणे दिसते. हवा स्वच्छ आणि आकाश निरभ्र असेल तेव्हा या बुरुजावरून दिसणारे अन्य गडांचे डोंगर ओळखता येतात. आपल्याजवळ दुर्बीण असेल दूरदूरचे गड पाहण्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे होता येईल.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

गडावर मुक्काम करण्याची कोणत्याही प्रकारची नाही. निर्जन ठिकाणी मुक्काम करणे सरीसृप किंवा अन्य प्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो.

गडावर खाण्यापिण्याचीही कोणतीही सोय नाही. जवळच असलेल्या रोहा शहरात मुक्कामाची आणि जेवणाची सोय होऊ शकते. येथे मुक्काम करून अवचितगडासह जवळपासचे गड पाहता येतात.

आवर्जून वाचावे असे काही

  1. स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/Raigad fort information in marathi
  2. अजिंक्य सागरी दुर्ग:जंजिरा /Murud Janjira Fort
  3. किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

Leave a comment