पुण्यातील वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने नवरा सासू, सासरे, नणंद यांच्या छळाला कंटाळून अखेर आत्महत्या केली. खरे तर हा हुंडाबळीच आहे. काय आहे सविस्तर घटना? जाणून घेऊया.
पुण्यातील वैष्णवी हगवणेने छळाला कंटाळून केली आत्महत्या.
2023 साली वैष्णवी कस्पटे या तरुणीने शशांक हगवणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाशी विवाह केला होता. वैष्णवीने हा प्रेम विवाह केला होता. तरीसुद्धा तिच्या आई-वडिलांनी लग्नात भरमसाठ हुंडा दिला होता. शशांक हगवणे याला राजकीय वरदहस्त असल्यामुळे हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा गेल्या दोन वर्षात अतोनात छळ केला आणि त्याचा परिणाम म्हणून वैष्णवी हगवणे हिने नवरा सासू , सासरे, ननंद यांच्या छळाला कंटाळून आपल्या लहान बाळाला मागे ठेवून अखेर आत्महत्या केली. वैष्णवीच्या आई-वडिलांनी लग्नातच वैष्णवीला हुंडा म्हणून 51 तोळे सोने दिले होते. म्हणजे आजच्या बाजार भावाप्रमाणे 51 लाख रुपयांचे सोने दिले होते. याशिवाय सात किलो चांदीच्या मूर्ती, भांडी ,फॉर्च्यूनर गाडी आणि इतर साहित्य हुंडा म्हणून दिले होते. त्याचबरोबर एका आलिशान हॉलमध्ये लग्न लावून दिले होते .या लग्नाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
फॉर्च्यूनर गाडी पाहून अजित पवार काय म्हणाले?
शशांक आणि वैष्णवी हगवणे यांच्या लग्नाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. या लग्नात अजित पवार यांच्या हस्तेच शशांक हगवणे याला फॉर्च्यूनर गाडीची चावी प्रदान करण्यात आली होती. फॉर्च्यूनर गाडी पाहून अजित पवार यांनी खोचक सवाल ही केला होता. काय रे शशांक, ही गाडी हुंडा म्हणून तर घेतली नाहीस ना? यावर मिस्कील अशाही उमटल्या होत्या; पण पडद्याआड काय काय घडले याचा अजित पवार यांना थांगपत्ताही नव्हता.
वैष्णवीच्या आई-वडिलांनी वाचला छळाचा पाढा
वैष्णवीने आकस्मिक आत्महत्या केल्यामुळे वैष्णवीच्या आई-वडिलांनी टाहो फोडला. त्यांना शंका आली की प्रचंड प्रमाणात छळ केल्यामुळेच वैष्णवीने जीवाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन महिन्यापूर्वीच वैष्णवीकडून दोन कोटी रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी मागितले होते. एवढी मोठी रक्कम वैष्णवीच्या आई-वडिलांना देणे शक्य झाले नाही. त्यामुळेच वैष्णवीच्या सासू-सासरे ,नणंद आणि नवरा यांनी वैष्णवीचा अतोनात छळ केला असावा आणि त्यातूनच तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असे आई-वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वैष्णवीच्या वडिलांचे म्हणणे तर आहे की वैष्णवीला तिच्या सासरच्याने मारूनच टाकले आहे.
वैष्णवीचा नवरा, सासू, ननंद यांना तातडीने अटक
पुण्यातील एका राजकीय घराण्यातील सुनेने आत्महत्या केली आणि तीही हुंड्यासाठी! ही बातमी पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली . वैष्णवीच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर तक्रार दाखल केली. त्यांना माहीत होते की केवळ पैशाच्या लोभापाई सासरच्या मंडळींनी वैष्णवीला मारून टाकले आहे. वैष्णवी माहेरी आली तरी पन्नास हजार ते एक लाख रुपये जातेवेळी घेऊन जायची. एवढा या सासरच्या मंडळींचा लोभ होता. या लोभामुळेच वैष्णवीने जीवाला कंटाळून शेवटी आत्महत्या केली आणि त्याचा परिणाम म्हणून पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू, नणंद यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा , दीर पसार आहेत. या घटनेबद्दल समाजातून तीव्र पडसाद उमटत आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी समाजातून होत आहे. आरोपीला कठोर अशी शिक्षा करावी की जेणेकरून पुन्हा एखाद्या वैष्णवीचा असा हुंडाबळी होऊ नये अशी ही मागणी समाजातून होत आहे.