रामनवमी: संपूर्ण माहिती/Ram Navmi Information Marathi

भारत हा महान परंपरावादी आणि सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. चार महायुगांपैकी त्रेतायुग हे दुसरे युग या युगातच दशरथपुत्र रामाचा- अयोध्येच्या राजाचा जन्म झाला.राम हा धर्मनिष्ट होता.तत्त्वनिष्ठ होता.त्रेतायुगात धर्म हा शब्द तत्त्व, नीती या अर्थाने वापरला जात असे, राजा राम हा मनुष्य’ होता.तो अवतार पुरूष नव्हता.एक आदर्श राजा होता. म्हणूनच ‘रामराज्य’ यावे, प्रजेचे कल्याण व्हावे, असे म्हटले जाते. प्रजाहितदक्ष श्रीरामाची आपण माहिती घेणार आहोत.

 

चार महान युगे: Four Great Eras

मनुष्य रानटी अवस्थेतून जेव्हा मनुष्य अवस्थेत आला, तेव्हा तो अधिक समुहात राहू लागला.समुहात राहत असताना सामाजिक बंधने आली. नियम आले, नीतिमत्ता आली, था सर्वांनाच पुढे आपण धर्म म्हणू लागलो,.पुढे हळूहळू व्यवहार विकसित झाले.भारतातील पहिले कालमापन म्हणजेच चार महायुगे होय.

चार युगातील पहिले युग म्हणजेच कृत युग होय. यालाच सत्ययुग असे संबोधतात सत्ययुग हे 4800X360 = 17,28,000 वर्षाचे होते. दुसरे युग म्हणजे त्रेता युग होय, त्रेतायुग हे 3600X 360 = 12,96,000 वर्षांचे होते. त्रेतायुगात श्रीरामाचा जन्म झाला. तिसरे युग हे द्वापार युग म्हणून सोळखले जाते. द्वापार युगाचा कालखंड हा 2400 × 360 = 8,64,000 वर्षाचा होता.आणि चौथे युग म्हणजे कलियुग होय. श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगाच्या शेवटी झाला. महाभारतातील युद्ध सुरु करण्यासाठी श्रीकृष्णाने शंख फुंकले, तेथून पुढे कलियुग सुरु झाले. आपण सर्वजण ‌कलियुगात जगत आहोत. कालियुगाचा कालखंड 1200X360 =4,82,000 वर्षाचा राहील. तेथून पुढे पृथ्वी नष्ट होईल. तत्कालीन कालगणनेनुसार हा हिशेब मांडला आहे. कालगणनेच्या जंजाळात अडकण्यापेक्षा आपण श्रीरामाचे चरित्र समजून घेऊया.

श्रीरामाचा जन्म केव्हा झाला ? When was Sri Rama’s born?

 

श्रीरामाचा (Ram) जन्म त्रेतायुगात झाला. भारतीय सौर वर्षा प्रमाणे श्रीरामाचा जन्म सौर कालगणनेतील पहिल्या महिन्यात म्हणजे चैत्र महिन्यात शुद्ध नवमीला झाला. थोडक्यात श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला. रामजन्म संपूर्ण भारतात धुमधडाक्यात भक्तिभावाने साजरा करतात.

आयोध्येचा राजा दशरथ याला तीन राण्या होत्या. कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी. या दशरथ राजाच्या तीन राण्या होत, या तीन राण्यांपैकी कौशल्येला राम झाला. कैकयीला भरत झाला, तर सुमित्राला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोन पुत्र झाले. राम हा सर्वांत ज्येष्ठ पुत्र.राजा होण्याचा मान त्याचाच; पण कैकयीला मंथरा नावाच्या दासीने फितरले.दशरथ राजाने तिला (कैकयीला) दिलेल्या वचनांची आठवण करून दिली आणि संपूर्ण रामायण घडले.

कैकयीला दशरथाने वचन का दिले ? Why did Dasaratha promise to Kaikyi?

कैकयी ही कैकय देशातील राजा अश्वपती व राणी शुभलक्षणा यांची कन्या होय. एकदा दररथ राजा महान पराक्रमी राजा ‘शंबर’ याच्याविरुद्‌ध लढण्यासाठी गेला होता. दशरथ राजा इंद्राला मदत करण्यासाठी गेला होता. अशीही आख्यायिका आहे. या युद्‌धात दशरथ राजाच्या रथाचे चाक तुटून पडले होते. दशरथाचा परभव निश्चित होता. रथात कैकयी होती. कैकयीने मोठ्या धीराने दशरथाला साथ दिली. त्यामुळे दशरथ लढू शकला.आणि शंबरावर विजय मिळवू शकला. यु‌द्धात कैकयीने दाखवलेल्या साहसामुळे राजा दशरथ भावूक झाला. ते कैकयीला म्हणाला, “तुला हवे ते वचन माग… “.असे कैकयी स्वामीनिष्ठ होती.ती म्हणाली, “मला वचनांची काहीच गरज नाही; पण पुढे-मागे बघू.” विषय तेथेच संपला; पण वचनपूर्ती अपूर्ण राहिली.

रामराज्याभिषेक आणि मंथराचा प्रवेश/Rama’s coronation and entry of Manthara

दशरथ राजा यथाकाल वृद्ध झाला. त्याने प्रथेप्रमाणे आपला सर्वगुणसंपन्न ज्येष्ठ पुत्र राम याचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले .राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. आयोध्या नगरी आनंदून गेली; पण नियतीच्या मनात वेगळेच होते. मंथरा या कैकयीच्या दासीने कैकयीला वारंवार वचनाची आठवण करून देऊन वचनपूर्ती साठी हीच संधी असल्याचे सांगितले. अखेर कैकयी बिथरली. तिने दशरथाकडे वचनपूर्तीची मागणी केली.

कैकयीने मागितलेली वचने:Promises sought by Kaikai

1) रामाला 14 वर्षे वनवासात पाठवावे.

2) आपला पुत्र भरत यास आयोध्थेच्या गादीवर बसावे.

कैकयीने मागितलेल्या या वचनांनी दशरथ राजा हबकून गेला; पण रामाला ही गोष्ट समजल्यावर त्याने लगेच राज्याभिषेकाचा मोह सोडला आणि वनवासाला जाण्यास निघाला. वनवासाला जाताना पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांनी हट्‌टाने रामाबरोबर जाण्याचा आग्रह धरला. अखेर रामाने होकार दिला. राम, सीता, लक्ष्मण तिघेही वनवासाला गेले आणि तेथून पुढे राम, लक्ष्मण, सीता, भरत यांच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा सुरु झाली.

रामायण कोणी लिहिले ?Who wrote Ramayana?

मूळ रामायण हे वाल्मिकीने लिहिले. वाल्मिकी हा वाल्या कोळी- एक दरोडेखोर म्हणून प्रसिद्‌ध होता.त्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाल्यावर खूप तपश्चर्या करून वाल्याचा वाल्मिकी झाला. त्याच काळात रामजन्म झाला. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने लिहिलेले हे पहिलेच महाकाव्य आहे. जे जगन्मान्य झाले. त्यानंतर अनेक ऋषी-मुनींनी रामायण लिहिले आहे. संत तुलसीदास यांचे ‘रामचरितमानस हे महाकाव्य प्रसिद्ध आहे. संत एकनाथ यांनी पंधराव्या शतकात ‘भावार्थ रामायण’ लिहिले. ग. दि. माडगूळकर यांनी ‘गीत रामायण लिहिले. याशिवाय प्राचीन काळापासून कन्नड, तेलुगु, मल्याळम्, हिंदी, संस्कृत, गुजराती इत्यादी भाषांमध्ये अनेक ग्रंथकारांनी रामायण लिहिले आहे. पुराणात ,भहाभारत ग्रंथात रामायणातील कथांचे दाखले आले आहेत. पुनर्लेखन आणि विशिष्ट वर्गाने आपला स्वार्थ ठेवून लेखन केल्यामुळे रामायणातील अनेक प्रसंग हे नंतर सोयीनुसार घुसवले आहेत.

रामायणातील कांड: Sections of the Ramayana

 

रामायण या महाकाव्याचे सात कांड (खंड) पडलेले आहेत. ते पुढील प्रमाणे.

1) बालकांड: यात श्रीरामाच्या बालपणातील घटनांचा समावेश आहे.

2) आयोध्याकांड :- आयोध्येत घडलेल्या घटनांचा समावेश, राम वनवासात जाणे, दशरथाचा पुत्र शोक.

8) अरण्यकांड : वनवासातील राम, सीता, लक्ष्मण यांचे जीवन, सीतेचे अपहरण.

4) किष्किंधा कांड: सीतेचा शोध. सुग्रीव, हनुमंत, वानरसेनेची भेट. यु‌द्धाची तयारी.

5) सुंदरकांड: हनुमंताचा समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश. लंका दहन. अशोक वनात सीतेची आणि हनुमंताची भेट.

6) युद्धकांड : राम-रावण युद्ध. रावणाचा वध. रामाचे पुष्पक यानातून सहपरिवार आयोध्येत आगमन.

7) उत्तर रामायण: प्रजेमध्ये सीतेबद्दल संशय, ऋषी वाल्मिकींच्या आश्रमात सीता लव-कुश.सीतेचे आत्मबलिदान. श्रीरामाचा शोक.

उत्तर रामायणासह रामायणातील अनेक घटना या नंतर घुसवल्या आहेत.त्यामुळे काही कथांमुळे रामाच्या व्यक्तिमत्त्वाला बाधा येते.

रामायणातील काही घटना-प्रसंग

क्षत्रिय कुलवंत

राजा राम हा क्षत्रिय कुलवंत होता. त्रेतायुगात ही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.महर्षी वशिष्ठ हे श्रीरामाचे गुरु होते. गुरुगृही जाऊन राजा रामाने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. तत्कालीन गुरु फक्त क्षत्रियांनाच शिक्षण देत होते. राम हा विष्णूचा अवतार मानला जातो;पण हे सर्व थोतांड आहे. राम हा एक सत्त्वशील राजा होता. तो पराक्रमी होता. तो धर्मनिष्ठ (तत्त्वनिष्ठ) होता. म्हणूनच रामाला विष्णूच्या अवतारात गोवले आहे.

बंधूप्रेम

 

राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न या चार भावांतील बंधुप्रेम अतुलनीय असे होते. राम वनवासाला गेला हे जेव्हा भरतला समजले, तेव्हा तो खूप दुःखी-कष्टी झाला. तो रामाला नेण्यासाठी वनात गेला. खूप विनवणी करुनही राम आला नाही. शेवटी रामाच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या पादुका घेऊन भरत आयोध्येला आला आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवून रामाच्या नावाने त्याने चौदा वर्षे राज्य केले;पण सिंहासनाचा मोह त्याने टाळला. लक्ष्मणने वनात डोळ्यांत तेल घालून रामाच्या कुटीला पहारा दिला. लक्ष्मणाने आपल्या पत्नीचा – उर्मिलेचा चौदा वर्षे त्याग करून (आयोध्थेतच सोडून) स्वतः निष्ठेने रामाची सेवा केली. तुम्ही जेव्हा “जय श्रीराम”म्हणता तेव्हा राजा रामाकडे असलेल्या गुणांचा अंमल केला पाहिजे.

एक पत्नी, एक वचनी, एक बाणी राम:

तत्कालीन राजे लोक अनेक पत्नींशी विवाह करत असत.दशरथ राजाने तीन पत्नीशी विवाह केला होता; पण राजा राम मर्यादा पुरु‌षोत्तम होता.त्याने फक्त सीतेशी विवाह केला आणि अखेरपर्यंत सीतेशी एकनिष्ठ राहिला.

राम एकवचनी होता.दिलेले वचन तो निष्ठेने पाळायचा.आपल्या पिताश्रींना दिलेले वचन पाळून चौदा वर्षे वनवास भोगूनच राम आयोध्येला आला.रामाने मारलेला बाण शत्रूला बिनचूक लागायचा. त्याचा एकही बाण वाया एक जात नसे.म्हणूनच रामाला एक वचनी, एक पत्नी व एक बाणी म्हटले जाते.

“जेव्हा आपण राजाला ईश्वर मानतो, देव मानतो. तेव्हा त्या राजाचे मूल्यमापन करणे खूप कठीण जाते.राजा हा आपला पालक ,रक्षक असतो. म्हणूनच राजाला प्रभू ही उपमा दिली.आपण श्रीरामालाही प्रभू, प्रभू श्रीदाम असे संबोधतो.

महाराष्ट्रातील रामटेक येथे श्रीरामाचे वास्तव्य : Abode of Sri Rama at Ramtek in Maharashtra

 

14 वर्षे वनवास भोगत असताना श्रीरामाने अखेरच्या टप्यात महाराष्ट्रातील रामटेक येथे वास्तव्य केले होते. असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आणि पद्‌मपुराणात आलेला आहे. येथूनच रावणाचे सीता हरण केले होते.आजही रामटेक येथे प्रभू श्री रामाच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आढळतात.

रामाने शबरीची बोरे खाल्ली:

रामायण काळात चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. हे जरी खरे असले तरी वनवासात असताना एका आदिवासी महिलेने-शबरीने स्वतःच्या हाताने तोडून चव चाखून गोड गोड बोरे प्रभू श्रीरामासाठी घेऊन आली होती. लक्ष्मणाने ही बोरे खाण्यास विरोध केला होता; पण रामाने आवडीने बोरे खाऊन शबरीच्या प्रेमाचा मान राखला होता. राजा राम हा भेद‌भाव न पाळणारा असा राजा होता.

शंबूकाची हत्या कोणी केली ?Who killed Shambuka?

शंबूक हा शूद्र समाजातील ऋषी होता. त्याने घनघोर तपश्चर्या करून ज्ञान संपादन करण्याचा प्रयल केला. हा काय शंबूकाचा गुन्हा झाला का? शंबूकाच्या हातून एका ब्राह्मण पुत्राची हत्या झाली अशी वावडी उठवून वैदिकांनीच शंबूकाला ठार मारले; पण बहुजनांचा रोष नको म्हणून वैदिकांनी वेगळीच युक्ती केली.शूद्रांना तपश्वर्या करण्याचा अधिकार नाही म्हणून रामाने शंबूकाला त्याला ठार मारले व ब्राह्मण पुत्राला जिवंत केल्याची कथा पुराणांत सांगितली. रामाने शंबूकाला शिक्षा दिली. याचा अर्थ रामाला चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य होती, असे वैदिकांना पटवून सांगायचे होते. परंतु शबरीच्या उदाहरण आणि वानर सेनेचे घेतलेले साहाय्य या गोष्टी स्पष्ट करतात की राम भेदभाव, उच्चनीचता पाळणारा नव्हता.

उत्तर रामायण: सातवा कांड:Uttar ramayana /section seven

 

उत्तर रामायणात रामाने रयतेचे ऐकून सीतेला वनवासात पाठविले. अशी कथा आहे. सीतेने वाल्मिकी महर्षींच्या आश्रमात राहून लव आणि कुश यांना जन्म दिला. कालांतराने रामाचे डोळे उघडले. तो मुलांना स्वीकारतो; पण सीता पुन्हा रामाला स्वीकारत नाही. ती देह त्याग करते.

अशी कथा उत्तर रामायण कांडात असली तरी ,उत्तर रामायणातील घटना घडलीच नसल्याचा नवीन इतिहास संशोधकांचा दावा आहे.उत्तर रामायणातील घटनांमुळे रामाने पत्नीचा- सीतेचा त्याग केला .हे कुणालाच आवडले नाही. या घटनेमुळे रामाचे व्यक्तिमत्त्व अपूर्ण वाटते. पत्नीचा त्याग करणे ही रामाची सर्वांत मोठी चूक आहे; पण जे उत्तर रामायण घडलेच नाही. त्याबद्दल रामाला दोष देण्यात काय अर्थ आहे.

थोड‌क्यात ,सारासार विचार करता प्रभू श्रीरामाचा ज्या काळात जन्म झाला, त्या काळाचा विचार करता श्रीरामाने जे काही जनहितासाठी निर्णय घेतले. त्यामुळेच समाजात रामराज्याची अपेक्षा पूर्ण झाली. सामाजिक स्वास्थ्यासाठी राजा रामाने नियमावली बन‌वली होती. जे नियम प्रजेला, तेच नियम राजाला होते. छत्रपती शिवरायांनी भगवान शंकराचे अनेक आदर्श घेत‌ले, तसे एक आदर्श राज्यकर्ता म्हणून श्रीरामाचे आदर्श घेतले. राजा राम एक माणूस होता. त्याच्याकडे कोणतेही दैवत्व नव्हते. त् राजाला ईश्वर मानल्यामुळे समाजात अनेक अंधश्रद्‌धा पसरतात. उलट राजाच्या ठिकाणी असलेले गुण घेतले; तर ते अधिक समाजहितासाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर होईल.

जय श्री राम ।।

सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ।

शब्दांकन: –

संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, राधानगरी.

Leave a comment