BuddhaLifeStory-Part : 17 : बुद्धाची देशत्यागाची तयारी

बुद्धाचा जीवन परिचय करून देत असताना मागील भाग 16 मध्ये सेनापती आणि सि‌द्धार्थ यांच्यात जो युद्धाच्या संबंधी वाद झाला त्यातून सिद्धार्थचा संघात पराभव झाला. दुसऱ्या दिवशी सेनापतीने कोलियाशी युद्ध करण्यासाठी व सैन्य उभारावासाठी शाक्य संघाची सभा बोलावली. त्या सभेत सेनापतीने आणखी एक ठराव मांडला तो असा-

“कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्षे वयाच्या युवकांची सैन्यात भरती करण्यासाठी शाक्य संघाने मला परवानगी द्यावी. ”

संघाच्या सभेत दोन्ही बाजूने मतदान करणारे लोक उपस्थित होते. ठरावाच्या बाजूने व ठरावाच्या विरोधी बाजूने असलेले लोक उपस्थित होते. अर्थात युद्धासाठी बहुसंख्य लोकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते, साहजिकच सैन्य भरतीसाठी सुद्धा ठरावाच्या बाजूनेच बहुसंख्य सभासदांनी मतदान केले. ज्यांनी ठरावाच्या विरोधी मतदान केले, ते अल्पसंख्याक ठरले. आता प्रश्न असा निर्माण झाला की अल्पसंख्यांकांनी ठरावाच्या बाजूने नमावे की नमू नये? सिद्धार्थने आपली बाजू ठामपणे मांडली.

” मित्रहो तुमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे तुम्हाला हवा तो निर्णय घेऊ शकता. सैन्य भरती करू शकता. पण माझा या युद्धाला विरोध असल्याने मी सैन्यात भरती होणार नाही किंवा तुमच्या बाजूने यु‌द्धही करणार नाही; पण याचा अर्थ असा घेऊ नये की मी युद्धाला घाबरतो आहे.”

सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापती म्हणाला,

“हे सि‌द्धार्थ, संघाचा सभासद होताना तू काय शपथ घेतली होतीस ती आठव . तू तुझी शपथ मोडलीस तर तुला लोकनिंदेला सामोरे जावे लागेल”
यावर सिद्‌धार्थ म्हणाला,

“होय, मी माझे तन मन धन अर्पण करून शाक्यांचे हितसंबंध जपण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे; पण हे युद्ध शाक्यांच्या हित संबंधाचे नाही आणि संरक्षणाचेही नाही. या युद्धाने शाक्यांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हणून माझा या युद्धाला विरोध कायम आहे. त्यामुळे मला लोक निंदेची परवा नाही.”

कोलियांना बरोबरच्या सततच्या संघर्षामुळे शाक्य गणराजा हळूहळू कोशल राज्याच्या हातचे बाहुले बनत चालले आहे. आपण आपले स्वातंत्र्य गमवत चाललो आहोत. याचीही सिद्धार्थने शाक्य संघाला जाणीव करून दिली. सेनापतीला या गोष्टीचा राग आला व तो सिद्‌धार्थला उद्देशून म्हणाला-

“तुझे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन कर. नाही तर संघाने घेतलेल्या देहान्ताची शिक्षा किंवा देश त्यागाची शिक्षा कोशल नरेशही बदलू शकणार नाही. पण इतका कठोर निर्णय संघ घेणार नाही. पण तुझ्या कुटुंबावर संघ सामाजिक बहिष्कार टाकू शकेल. आणि तुझ्या कुटुंबाची जमीनही जप्त करील.त्यासाठी कोशल नरेशची संघाला अनुमती घ्यायची आवश्यकता भासणार नाही.”

तत्कालीन सामाजिक व्यवस्था पाहिली तर शाक्य संघाने घेतलेला निर्णय हा शाक्य राजवटीतील प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक होता. मग तो राजा असो की प्रजा (नागरिक)! सिद्‌धार्थ हा स्वतः राजपुत्र होता, पण त्यालाही शाक्य संघाचे नियम बंधनकारक होते, त्याला संघाच्या निर्णयाचे पालन केले नाही तर दुष्परिणाम भोगावे लागणार याची कल्पना होती. त्याच्याजवळ तीन पर्याय होते.

1 देहांत शासनाला संमती देणे.

2 देशत्यागाला संमती देणे.

3 कुटुंबियांवर बहिष्कार ओढवून घेणे व मालमत्तेची जप्ती होऊ देणे.

पहिला पर्याय स्वीकारणे म्हणजे आत्महत्या करणे. हा पर्याय सि‌द्धार्थला मान्यच नव्हता. तिसरा पर्याय कुटुंबियांच्या दृष्टीने त्रासदायक होता. हा पर्याय असह्य होता. म्हणून सि‌द्धार्थाने संघापुढे आपले विचार मांडले.

” हे सभाजनहो, कृपा करून माझ्या कुटुंबियांना कोणताही त्रास देऊ नका. सामाजिक बहिष्कार त्यांना असह्य होईल.कुटुंबाची जमीन हिरावून घेतलीत तर कुटुंबाची उपासमार होईल. माझे कुटुंब निरपराधी आहे. तुमच्या दृष्टीने मीच अपराधी आहे. मला तुम्ही देहांताची शिक्षा द्या किंवा देश त्यागाची शिक्षा द्या. मी ती शिक्षा एकटाच भोगेन. मी ही शिक्षा कमी व्हावी किंवा रद्द व्हावी यासाठी कोशल नरेशकडे अजिबात याचना करणार नाही.

पुढे काय झाले ते भाग क्रमांक 18 मध्ये पाहू.

Leave a comment