छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून इतिहासातील अनेक विषय चर्चेत आलेत. त्यांपैकीच रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्यासंबंधीचा विषय आहे. खरंच शिवाजी महाराजांना कुत्रा पाळण्यासाठी वेळ होता का? रायगडावर असणारी समाधी वाघ्या कुत्र्याचीच आहे का ? काय आहे खरा इतिहास ? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर मृत्यू झाला. त्यांच्या अकाली आणि आकस्मिक मृत्यूमुळे स्वराज्याचे खूप मोठे नुकसान झाले. छत्रपती शिवरायांचे अंतिम संस्कार म्हणजे अंत्यदहन हे जगदीश्वर मंदिराशेजारीच रायगडावर झाले. त्याच ठिकाणी शिवरायांची समाधी बांधली गेली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी छोटीशी साधी दगडी समाधी बांधली होती. त्यानंतर त्या समाधीचा जीर्णोद्धार झाला. सध्या तुम्ही शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारीच कल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी पाहता. त्याच समाधीविषयी आपण अधिक माहिती ऐतिहासिक दाखल्यासह देणार आहोत.
*वाघ्या कुत्र्याची समाधी- एक विकृत इतिहास*
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना बदनामीकारक लेखन करणारे काही मनुस्मृतीपुरस्कृत मंडळी होती. ती आजही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे छत्रपती होते. ते सर्वांना समान न्यायाने वागवत असत. सर्वधर्मसमभाव आणि जातीभेद विरहित त्यांनी राज्य निर्माण केले होते. त्यांचाच वसा आणि वारसा लाभलेले छत्रपती संभाजी महाराज यांनीही शिवरायांचे धोरण पुढे राबवले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज काही विशिष्ट लोकांना नको होते. म्हणूनच त्यांच्यावर बदनामीकारक आणि चिखलफेक लेखन करणारे काही विकृत लेखक होते . त्यांतीलच एक लेखक म्हणजे राम गणेश गडकरी होय.
राम गणेश गडकरी यांनी आपल्या लेखनातून छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती संभाजीराजे यांना बदनाम करणारे लेखन लिहून त्याला खतपाणी घातले. त्यांचे हे लेखन काही ठराविक मंडळींनी जाणीवपूर्वक सगळीकडे पोहोचले आणि त्याचा प्रसार केला. त्यांचा हेतू हाच होता की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रतिमा मलीन व्हाव्यात. गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकातील अर्पण पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करणारा उल्लेख आहे. त्यांच्या अर्पण पत्रिकेतच वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. त्या अर्पण पत्रिकेचा दाखला घेऊनच रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी आणि तीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेजारी उभारण्यात आली.
सन 1936 साली हे वाघ्या कुत्र्याचे स्मारक बसवण्यात आले. गडकर्यांच्या नाटकातील अर्पण पत्रिकेचा आधार घेऊन हे स्मारक उभारण्यात आले आणि त्या वेळपासून रायगडावर आणि महाराष्ट्रातील एक दंतकथा पसरवली. …. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेत वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी घेतली. हा वाघ्या कुत्रा शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा होता. वाघ्या कुत्र्याचा ही शिवाजी महाराजांच्यावर खूप लळा होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यानेही आपले जीवन संपवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली. अशा प्रकारची दंतकथा 1936 सालापासून काही पुस्तकातून आणि तोंडातोंडी पसरवण्यात आली. वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी वाघ्या कुत्रा पाळला होता , याचा एकही दाखला पुरालेखागार विभागाकडे नाही. केवळ कट कारस्थान करून शिवाजी महाराजांना तुच्छ लेखण्यासाठी अशाप्रकारे दुष्कृत्य केल्याचे जाणवते.
*कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांची मागणी*
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी 24 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे 2025 पूर्वी रायगडावरून हटवावी. अशा स्वरूपाची लेखी मागणी केली. या मागणीने संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला. अशा खोट्या दंतकथा कोण पसरवते? काय असतो त्यांचा या मागचा हेतू? हे संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि तमाम भारतीयांना जाणून घ्यायचे आहे. म्हणूनच छत्रपती संभाजीराजे यांनी कल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणजेच स्मारक रायगडावरून हटवण्याची मागणी केली आहे.
*रायगडचा इतिहास*
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचा परीसर जिंकल्यानंतर रायगडावर स्वतः किल्ला बांधून घेतला. हा किल्ला इतका मजबूत होता की तो स्वराज्याची राजधानी म्हणून निवडण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणी येसूबाई यांनी रायगडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर रायगड औरंगजेबाच्या ताब्यात गेला. सूर्याजी पिसाळ या फितूराने रायगडावर जाणारा गुप्त मार्ग मुघलांना दाखवला आणि राणी येसूबाई यांनी नऊ महिने लढा दिलेला रायगड अखेर औरंगजेबच्या ताब्यात गेला.
औरंगजेबच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या सुटकेनंतर रायगड ताब्यात घेतला. छत्रपती शाहू महाराज यांनी आपली राज्यकारभाराची गादी सातारा ही निवडल्यामुळे रायगडची जबाबदारी पोतणीस यांच्याकडे दिली. पुढे पोतनीसांकडून रायगड ताब्यात घेण्याचे काम पेशव्यांनी केले. पेशवाईच्या काळात रायगडला आणि शिवरायांच्या समाधीला उतरती कळा आली. समाधी दुर्लक्षित झाल्यामुळे त्या समाधीवर गवत, फुले उगवू लागली. सन 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता पूर्णतः संपुष्टात आली आणि इंग्रजांची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. त्यावेळी रायगड किल्ला सुद्धा पेशव्यांकडून इंग्रजांनी घेतला. कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने दुसरा बाजीराव पेशव्यांशी लढाई करून रायगड ताब्यात घेतला. कर्नल प्रॉथरने आपल्या दप्तरात रायगडचे आणि रायगडावरील स्थळांचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था ही नोंदवलेली आहे . शिवाजी महाराजांची अष्टकोनी समाधी त्याने आपल्या स्केचने चित्रित केली आहे. त्याने स्केच केलेल्या समाधीची माहिती आजही पुण्यात पुरालेखाकार्यालयात पाहायला मिळते . हा शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रथम दर्जाचा खूप मोठा दाखला असल्याचे मानले जाते. कर्नल प्रॉथरणे आपल्या लेखनात कुठेही वाघ्या कुत्र्याच्या समाधी विषयी लिहिलेले नाही.
*महात्मा फुले यांचा शोध*
महात्मा फुले यांच्या रूपाने शिवरायांच्या कार्याची ओळख नव्याने संपूर्ण महाराष्ट्राला झाली. त्यांनी सन 1669 मध्ये रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला. त्यावेळी महात्मा फुल्यांना समाधीजवळ जायला काही मंडळींनी विरोधही झाला. त्या विरोधापाठीमागे एकच उद्देश होता, तो म्हणजे शिवरायांची समाधी जशी जीर्ण अवस्थेत आहे तशीच राहावी. फुल्यांनी तेथील विरोध मोडीत काढून शिवाजी महाराजांच्या समाधीची सफाई केली. तेथेच त्यांनी शिवजयंती साजरी केली. शिवरायांच्या समाधीची दुरवस्था पाहून महात्मा फुले व्यथित झाले. फुल्यांनी शिवरायांच्या स्मारकाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला आणि रायगडावरून ते परतले. पुढे पुण्यातच हिरा बागेत महात्मा फुले यांनी सर्वात प्रथम शिवस्मारकाचा जीर्णोधार करण्यासाठी सभा बोलवली. बाळ गंगाधर टिळक यांनी शिवरायांच्या समाधीसाठी पैसे गोळा केले. पण त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी काहीच केले नाही.
द बुक ऑफ बॉम्बे ह्या पुस्तकाचे लेखक जेम्स डग्लस यानेही रायगडावरील शिवरायांच्या समाधीचे वर्णन केले आहे. त्यामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही.
*रिचर्ड टेम्पल यांचा दाखला*
मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल याने रायगड किल्ल्याला भेट दिली. त्यावेळी त्याने रायगड किल्ल्याचे आणि रायगडावर असलेल्या स्थळांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्याचबरोबर तेथील स्थळांचे स्केचिंग ही केले आहे. रिचर्ड टेम्पल याने शिवरायांच्या स्मारकाचे म्हणजेच समाधीचे स्केचिंग केले आहे. ते आजही आपल्याला पुराभिलेख कार्यालयात मिळू शकते . त्याने शिवरायांच्या समाधीचे सवितर वर्णन केले आहे. रिचर्ड याने काढलेल्या स्केचिंग मध्ये कुठेही कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही. ऑर्थर क्रॉफर्ड या मुंबईच्या कमिशनरने रायगडला भेट दिली होती. त्यानेही रायगडावरील स्थळांचे वर्णन केले आहे; पण त्याच्याही वर्णनामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचे वर्णन नाही.
*ब्रिटिश फॉरेस्ट खाते यांचे दाखले*
ब्रिटिश फॉरेस्ट खाते आणि कुलाबा अभियंता यांनी रायगडावरील विविध स्थळांचे नकाशे तयार केले होते. या स्थळांमध्ये शिवरायांच्या समाधीचाही उल्लेख आहे. त्यांच्याही नकाशात कुठेही वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही. सदर दाखले पुण्यातील पुरा लेखागारात उपलब्ध आहेत.
*कुलाबा गॅझेट*
1896 च्या दरम्यान कुलाबा गॅझेट प्रसिद्ध झाले. या कुलाबा गॅझेट मध्ये सुद्धा कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख नाही. मग हा कुत्रा आला कुठून? कोणी आणला त्याला? काय असेल त्या मागचा इतिहास? इतके पुरावे दिल्यानंतर सुज्ञ वाचकांना समजले असेलच.
*गडकरी यांचे राज संन्यास नाटक*
छत्रपती संभाजी महाराज यांचे चारित्र्य बदनाम करण्यासाठी काही ठराविक मंडळी सातत्याने प्रयत्न करत होते. राम गणेश गडकरी यांचे लेखन पाहता आणि राजसंन्यास हा नाटक वाचता संभाजी महाराज यांना बदनाम करण्याचा जणू विडाच त्यांनी उचलला आहे असे वाटते. गडकर्यांनी या नाटकाच्या अर्पण पत्रिकेत शिवरायांचेही बदनामीकरण केले आहे , याची जाणीव होते. गडकर्यांनी लिहिलेल्या राजसंन्यास नाटकाच्या अर्पण पत्रिकेत वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. या अर्पण पत्रिकेतील जसाच्या तसा मजकूर रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधी खालील शिलालेखात आहे. याचाच अर्थ वाघ्या कुत्र्याचा जन्म गडकर्यांच्या राजसंन्यास नाटकातील अर्पण पत्रिकेतूनच झाला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय गडकर्यांनी वाघ्या कुत्र्याचे वर्णन केलेच कसे? काय असावा त्यांचा या मागील हेतू? केवळ शिवरायांना तुच्छ लेखण्यासाठीच त्यांच्याजवळच वाघ्या कुत्र्याची समाधी निर्माण केलेली आहे असेच जाणवते. गडकर्यांसारख्या विकृत लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत विकृत लेखन केलेले आहे.
*भूपाल चांदुरकर यांचा महत्त्वपूर्ण दाखला*
सन 2000 साली भोपाल चांदुरकर या आर्किटेक्चरने ‘शोध शिवसमाधीचा’ या नावाने एक पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकात चांदूरकराने जो दाखला दिला आहे त्या दाखल्याने आपल्याला धक्काच बसतो. चांदुरकर यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी कुत्र्याचे स्मारक आहे, तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण स्थळ आहे. त्याच ठिकाणी शिवरायांना त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्याच्या शेजारी जी शिवरायांची समाधी आहे ती शिवरायांची समाधी नसून तो एक अष्टकोनी स्तंभ आहे. या स्तंभावरच पुढे शिवरायांची समाधी स्थापित केलेली आहे. चांदुरकर यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी सध्या कुत्र्याचे स्मारक आहे ती जर शिवरायांची दहन भूमी असेल तर अशा ठिकाणी कुत्र्याचे स्मारक उभारण्याचे विकृत कारस्थान कोणी आणि का बरे केले असेल? इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शिवरायांची बदनामी करण्याचा काय त्यांचा हेतू होता? केवळ आणि केवळ शिवराय हे बहुजनांचे ,सर्वांचे, सर्व धर्मांचे आदर करणारे व्यक्तिमत्व होते. हेच विकृत लेखकांना रुचले नाही. म्हणूनच त्यांना आणि छत्रपती संभाजी राजे यांना बदनाम करणारे लेखन यांच्या विकृत लेखणीतून उतरले आहे. चांदुरकर यांनी लिहिलेल्या शोध शिवसमाधीचा या पुस्तकात दिलेल्या दाखल्यांचा खरोखर पूनर्अभ्यास करण्याची गरज आहे.
*तुकोजी होळकर यांनाही बदनाम करण्याचा कट*
तुकोजी होळकर हे कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे मित्र होते. ते शाहू महाराजांची पुरोगामी चळवळ चालवण्यात अग्रेसर होते. राजर्षी शाहू महाराजांनी आपली बहीण चंद्रप्रभा हिचा विवाह तुकोजी होळकर यांचा मुलगा यशवंतराव होळकर याला देऊन रक्ताचे नाते निर्माण केले. शाहू महाराज आणि तुकोजी होळकर यांचे अति जवळीकतेचे संबंध आणि विचार नष्ट करण्याच्या हेतूनेच त्यांच्यावर हे बदनामीकारक दंत कथा लिहिल्या गेल्या आणि त्या पुढे चालू ठेवल्या. म्हणे तुकोजी होळकर इंग्रजांना घाबरत होते. म्हणून त्यांनी इंग्रजांना घाबरून वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले आणि त्या पैशातून वाघ्या कुत्र्याची समाधी बांधली. खरे तर तुकोजी होळकरांचे जे पुरोगामी विचार होते त्या विचाराला तडा देण्यासाठीच त्यांच्यावर खोट्या दंतकथा रचून त्यांना बदनाम करण्यात आले. तुकोजी होळकर यांनी इंग्रजांना घाबरून समाधीसाठी पैसे दिल्याचा कोठेही लिखित पुरावा नाही. अशा अनेक कल्पित कथा लिहिण्यात हे विकृत लेखक आणि विकृत संस्कृती खूप पटाईत आहे .त्याला अनेक बहुजन समाजातील लोक बळी पडत आहेत.
*पुरातत्व विभाग काय म्हणते?*
छत्रपती शिवरायांच्या समाधीलगत बांधलेल्या कल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी ही खरीखुरी समाधी आहे का? याबाबत अनेक लोकांनी माहितीच्या अधिकाराखाली पुराभिलेख कार्यालयात माहिती मागितली होती. पुराभिलेख कार्यालयाने वेळोवेळी हेच सिद्ध केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघ्या कुत्रा पाळला होता किंवा शिवरायांच्या चीतेत कुत्र्याने उडी घेतली होती. आणि शिवरायांच्या शेजारी बांधलेली समाधी ही वाघ्या कुत्र्याची आहे, याबाबत पुराभिलेख कार्यालयाकडे कोणताही पुरावा नाही . असेच पुराभिलेख कार्यालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
*2012 साली कुत्र्याची समाधी उध्वस्त*
छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली आक्रमक पवित्रा घेऊन कपोलकल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी उध्वस्त केली. ज्या समाधीबद्दल एकही पुरावा पुराभिलेख कार्यालयाकडे नाही, अशा समाधी बद्दल त्या समाधीची मोडतोड केली म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. 2023 सालच्या दरम्यान सर्व कार्यकर्ते निर्दोष सुटले. याचे कारण म्हणजे सदर समाधी ही कुत्र्याचीच असल्याची शासन न्यायालयात पुरावा दाखल करू शकले नाही. त्यामुळे सदर कार्यकर्ते निर्दोष सुटले. पण कल्पित समाधीचा इथेच प्रश्न सुटला नाही. तथाकथित काही मंडळींनी त्याच जागेवर पुन्हा कल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी उभारली. अर्थात ज्यांनी कुत्र्याची पुनर्स्थापना केली त्यांच्यावरच कारवाही होणे अपेक्षित होते ;पण तसे घडले नाही.
*पुतळाबाईंच्या समाधीवर कल्पित वाघ्या?*
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडावर आल्यावर त्यांनी आपल्या सर्व मातांचे डोळे पुसले त्यांना आधार दिला. सोयराबाई मासाहेब यांनाही आधार दिला. संभाजी महाराज आल्यावर पुतळाबाई यांनी आपण सती जाणार असल्याचे मत मांडले. संभाजी राजांनी जिजाऊ आऊसाहेबांचे उदाहरण दिले. पण पुतळाबाईंवर काहीही परिणाम झाला नाही त्यांनी शिवरायांच्या समाधी जवळच सती जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठीही गेल्या. शिवरायांच्या समाधी शेजारीच जी समाधी आहे ती पुतळाबाईंचीच आहे असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण यासाठी लागणारे ठोस कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
थोडक्यात, कल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी किंवा स्मारक याचा इतिहास पाहता हे केवळ शिवरायांना बदनाम करण्याचे आणि तुच्छ लेखण्याचे कृत्य आहे हे उघड उघड स्पष्टच होते. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी जी सध्या मागणी केली आहे ती मागणी म्हणजे रायगडावरील कल्पित वाघ्या कुत्र्याची मूर्ती हटवावी आणि शिवरायांना बदनाम करण्याचे थांबवावे अशा स्वरूपाचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्याची कार्यवाही लवकरच होऊन शिवरायांची समाधी कल्पित वाघ्या कुत्र्यापासून मुक्त होईल .अशी अपेक्षा बाळगूया.