Summer food and drinks-उन्हाळ्यातील आहार आणि पेये आणि पाण्याचे योग्य नियोजन, यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपण आरामदायी आणि चांगले जीवन जगू शकतो. ते कसे ते आपण पाहू.

ऋतुचक्र हे नियमित चालूच राहते. त्यातील उन्हाळा आणि उन्हाळ्याची धाहकता सर्वांना सहन करता येते, असे नाही. उन्हाळ्यात आहार कोणता असावा, उन्हाची दाहकता कमी होण्यासाठी घेतले जाणारी पेये आणि पाण्याचे योग्य नियोजन, यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपण आरामदायी आणि चांगले जीवन जगू शकतो. ते कसे ते आपण पाहू.

पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन :Proper planning of drinking water in summer.

भारतात आणि महाराष्ट्रातही दिवसेंदिवस उन्हाळा आणि त्याची तीव्रता वाढतच आहे. जागतिक तापमान वाढीमुळे उन्हाळ्यातील तापमान दरवर्षीच्या सरासरीपेक्षा येणाऱ्या पुढच्या वर्षी अधिकच असते. हे ग्लोबल वार्मिंग चे युद्ध काही क्षणात थांबवता येत नाही. म्हणून आपल्याला गप्पही बसून राहता येत नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास, मुबलक आणि शुद्ध पाणी पिल्यास उन्हाची तीव्रता आणि शरीराचे तापमान कमी करण्यासाठी म्हणजे योग्य त्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी काम करत राहते. सकाळी उठल्या उठल्या अनाशीपोटी लिंबाचे चार-पाच थेंब टाकून कोमट पाणी प्याल्यास त्याचा फायदा आपल्याला होतो. लिंबू पाणी प्यायल्यामुळे आपली पचनक्रिया चांगली सुधारते आणि मंदावलेली भूक सुधारते. उन्हाळ्यात जठराग्नी थोडा मंदावतो. भूक कमी लागते. अशावेळी सकाळच्या वेळी लिंबाचे कोमट पाणी प्यायल्यास पोट साफ होते आणि आपली पचनक्रिया सुधारते . त्याचबरोबर भूकही चांगली लागते. उन्हामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. हे पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी दिवसभर वरचेवर पाणी पीत राहिले पाहिजे.

उन्हाळ्यातील आहार: Summer food

उन्हाळ्यात तापमानाचा परिणाम म्हणून आपली भूक थोडी मंदावते. अशावेळी हलकाफुलका आहार घेतल्यास आपली पचनक्रिया सुधारते आणि इतर ऋतूप्रमाणे आपण छान पैकी जेवण घेऊ शकतो. उन्हाळ्यात तेलकट, तळलेले पदार्थ शक्यतो टाळावे. उष्णतावर्धक पदार्थ टाळावेत. ज्यांना मांसाहार करण्याची सवय आहे, त्यांनी उन्हाळ्यात कमी प्रमाणात मांसाहार करावा. सलाडचे प्रमाण आहारात नेहमी असावे. सकाळच्या वेळी सलाडचा नाश्ता घेतला तर सर्वोत्तमच. असा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी आणि उन्हाळ्यावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

ज्यांना फक्त दोन वेळा जेवण्याची सवय आहे, त्यांनी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जेवण करावे आणि सायंकाळचे जेवण सात ते साडेसात पूर्वी करावे. सायंकाळचे जेवण सातच्या दरम्यान केल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.

उन्हाळ्यातील पेये: Summer drinks

उन्हाळ्यातील दाहकता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात काही पेय आपण आपल्या दैनंदिन आहारात वापरली आणि त्यांचे नियमित सेवन केले तर कडक उन्हाचा त्रास आपल्याला होणार नाही.

गोड ताक

उन्हाळ्यात गोड ताक घेतल्यास आपल्या आरोग्यासाठी ते खूपच फायदेशीर ठरते. गोड ताक हे खूप पौष्टिक असते आणि उष्णतेवर नियंत्रण सुद्धा ठेवते. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकाने गोड ताकाचे सेवन केले पाहिजे. ताक शक्यतो सकाळच्या जेवणाच्या वेळी आणि दुपारच्या वेळी घ्यावे. सायंकाळच्या जेवणात दही किंवा ताक यांचा समावेश टाळावा.

दही

आहारात दह्याचा समावेश केल्यामुळे आपला आहार अधिक सुदृढ आणि पौष्टिक बनतो. जसा ताकाचा अधिक फायदा आहे, त्याचप्रमाणे दह्याचाही फायदा होतो. पण दही घेताना ते गोड असावे. रात्री लावलेले दही सकाळच्या जेवणात वापरावे. निश्चितच असे दही गोड, मधुर आणि आरोग्य चांगले असते.

लिंबू पाणी

कडक उन्हातून फिरल्यास आपल्याला थकवा जाणवतो. अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा घालवण्यासाठी लिंबू पाणी घेतल्यास आपल्याला ताजेतवाने वाटते. लिंबू पाणी घेताना त्यात साखर घालू नये. केवळ लिंबू पाणी प्यावे. किंचित मिठाचा वापर केल्यास चालेल. लिंबू पाण्यामुळे थकवा तर जातोच, त्याचबरोबर भूक पण चांगली लागते.

पन्हे

अनेक फळे ऋतुमानानुसार लागतात. आणि अशा फळांचा आस्वाद घेणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. उन्हाळ्यात आंबे मुबलक लागतात. कैऱ्यांपासून पन्हे चांगले बनवता येते. हे पन्हे खूप आरोग्यदायी असते. उन्हाळ्यात कैऱ्या सहज उपलब्ध होतात. कैऱ्या उकडून घेऊन त्याचे पन्हे तयार केले तर आपण दिवसातून दोन ते तीन वेळा पण हे घेऊ शकतो आणि उष्णतेची दाहकता कमी करू शकतो.

कोकम

कोकमच्या फळापासून आगळ तयार करतात. आगळ म्हणजे कोकमच्या फळाचा असा रस काढला जातो की त्यामध्ये साखर घातली जात नाही. हे आगळ पाण्यातून थोडे थोडे टाकून असे पाणी प्याल्यास आपल्या आरोग्यास ते खूप चांगले असते. आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यासाठी कोकम उपयुक्त ठरते. पण साखर घातलेले कोकम घेणे हे एवढेसे फायदेशीर ठरत नाही.

नारळ पाणी

नारळ पाणी हे सर्व ऋतूत सर्वोत्तम पेय आहे. उन्हाळ्यात नारळ पाणी घेतल्याने आपण आरोग्यमय जीवन जगू शकतो. नारळ पाणी घेणे थोडे खर्चिक असले तरी ज्यांची स्वतःची नारळाची झाडे आहेत त्यांनी नारळाच्या झाडांवरील शहाळे काढून त्याचे पाणी नियमित सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्ही निरोगी राहाल. नारळामध्ये सोडियम, पोटॅशियम यांचे प्रमाण योग्य असल्याने आपली त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत होते.

सब्जा

सब्जाच्या बिया भिजवून त्याचा रस काढून पिणे हे खूप आरोग्यदायी असते. अनेक पदार्थांमध्ये सब्जा वापरला जातो. खीर,ताक,फालुदा या पदार्थांमध्ये सब्जा असतो. सब्जाचा रस किंवा पाणी प्याल्याने आपल्या शरीरात थंडावा राहतो. उन्हाचा त्रास होत नाही.

अशाप्रकारे उन्हाळ्यात हलकाफुलका आहार आणि योग्य पेये यांचा समावेश केल्यास उन्हाळ ही आपण चांगल्या प्रकारे घालवू शकतो.

Leave a comment